अमळनेर खानदेश शिक्षण मंडळाच्या (खा.शि.) बहुचर्चित निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आतापासूनच चुरस निर्माण होण्याऐवजी प्रारंभी एकांगी चित्र पाहायला मिळत आहे. सत्ताधारी गटाने आघाडी घेत 'आशीर्वाद पॅनल'ची घोषणा करून प्रचाराचा नारळ उद्या फोडणार आहेत, तर दुसरीकडे विरोधकांचे 'पॅनल' अजूनही कागदावरच असल्याने त्यांचे 'भिजत घोंगडे' चर्चेचा विषय ठरले आहे.
या निवडणुकीत विद्यमान संचालकांनी जोरदार आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, मंडळाचे ज्येष्ठ संचालक विनोदभैय्या पाटील यांनी यावेळी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात न उतरता 'मार्गदर्शका'ची (मेंटर) भूमिका स्वीकारणे पसंत केले आहे. विनोदभैय्या पाटील, बाजरंगलाल अग्रवाल, कुंदनलाल अग्रवाल, मोहन जैन, किर्तीशेठ यांचे मार्गदर्शनाखाली 'आशीर्वाद पॅनल'ने प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
विरोधकांची 'शोधाशोध' आणि अंतर्गत कलह
एकीकडे सत्ताधारी सुसाट सुटले असताना, विरोधकांची अवस्था मात्र बिकट दिसत आहे. समोर लढण्यासाठी अजूनही 'तगडे उमेदवार' मिळत नसल्याने पॅनल गठीत करण्याचे काम रखडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार:
बिपीन पाटील व मंगलसिंग यांना पॅनलमध्ये घेण्यावरून विरोधकांच्या गोटात काहींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, मंगलसिंग सूर्यवंशी यांचे नाव पॅनलमध्ये समाविष्ट करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू असल्याची चर्चा 'खा.शि.' वर्तुळात आहे.
या अंतर्गत कलहामुळे विरोधकांचे पॅनल नेमके कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विरोधकांचा दावा:
"उशिरा येऊ, पण दुरुस्त येऊ!"
सध्याच्या परिस्थितीवर बोलताना विरोधकांनी सावध पवित्रा घेतला आहे. "उशिरा धावणाऱ्या गाड्याच अनेकदा वेळ भरून काढतात," असा दावा विरोधकांनी केला असला, तरी प्रत्यक्षात परिस्थिती आव्हानात्मक आहे.
नेहमीप्रमाणे या निवडणुकीत दोन मुख्य पॅनलमध्ये 'काटे की टक्कर' होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी किमान ४ तगडे उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आशीर्वाद पॅनलच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या पॅनलची सर्व भिस्त आता प्रामुख्याने नवख्या चेहऱ्यांवरच असेल, असे सध्याचे चित्र आहे.
सविस्तर उद्या पुन्हा.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments